नेवासा फाटा–मुकिंदपूर शिवाजीनगर परिसरात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; ग्रामस्थ संतप्त
नेवासा प्रतिनिधी.नेवासा फाटा येथील मुकिंदपूर शिवाजीनगर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळाला पाणी न आल्यामुळे महिला, वृद्ध व लहान मुलांचे मोठे हाल होत असून दैनंदिन गरजांसाठी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
या परिसरातील अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाड, दुरुस्तीचा अभाव व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पाणी कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे.