सांगली : पक्ष कोणा एकाच्या मालकीचा नाही, तर जनतेचा आहे, आम्ही घेतलेल्या भूमिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कागदपत्रांच्या आधारे शिक्कामोर्तब केले असून आजचा निकाल हा श्रीरामाचाच आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी निकालानंतर दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज दोन्ही गटांच्या आमदारांची अपात्रतेची याचिका फेटाळली आणि शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. त्यानंतर बाबर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आमदार अनिल बाबर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून आमची वाटचाल सुरूच राहील. मागील अडीच वर्षात करोना संकटाचे कारण पुढे करून घरी बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आताही सरकारपुढे संकटे आली, मात्र न डगमगता सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.
आमचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल या अगोदरच निवडणूक आयोगाने दिला आहे, आता यावर विधानसभा अध्यक्षांनी मोहोर उमटवली आहे असं अनिल बाबर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आम्ही बाजूला झालो ते केवळ पक्षावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठीच. यामुळे त्याला बंड म्हणता येणार नाही. पक्ष हा कोणा एकाच्या मालकीचा कधीच होऊ शकत नाही तर जनता हे ठरवत असते.
अनिल बाबर म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधात निकाल दिला तर न्यायालयात जाण्याचे इशारे देण्यात आले. मात्र आता आम्ही या सर्वाना सामोरे जाण्यास तयार आहे. आमची बाजू सत्याची, जनतेची आहे, त्यामुळे आजच्या निकालाचा कोणताही ताण अथवा तणाव आमच्यावर नव्हता. राज्याचा विकास झाला पाहिजे, सामान्य जनतेला न्याय मिळायला हवा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊनच आमची पुढची वाटचाल राहील. निकाल जाहीर होण्यापुर्वी काही मंडळी आम्ही जनतेच्या दारात जाऊ असे सांगत होते. आता त्यांनी जनतेच्या दारातच न्यायासाठी जावे. आमची त्याला तयारी आहे. जनता जनार्दनच अखेर कोण सत्य कोण असत्य हे सांगेल.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला.
उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केली. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत.
दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. आजच्या निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच कालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केला. दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.
ही बातमी वाचा:
Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) खरा निकाल लागलाच नसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी दिली. आधीच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उरलेली औपचारिकता आज पूर्ण झाली असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. त्यांनी आपल्या निकालात शिवसेना ही शिंदे यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला. तर, दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
आजच्या निकालाने औपचारिकता पूर्ण
त्यांनी पुढे म्हटले की, ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना( UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रवृत्तींविरोधात एकत्र लढू
निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू असं देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अजून निर्णय झाला नसल्याने वंचित आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा निर्णय झाला नसल्याची माहिती वंचितकडून देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले, ठाकरेंची टीका
आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते आता समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवून दिलं. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला.