Bihar Election : बिहारमधील गंगा वाहत पुढे पश्चिम बंगालला जाते. आगामी काळात आम्ही पश्चिम बंगालमधील जंगलराज संपवू, असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमधील विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारच्या प्रत्येक घरात आज मखान्याची खीर बनवली जाईल. निवडणुकीच्या निकालाने अशरक्षः विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.
हिंदीत याचे वर्णन करत असताना ते म्हणाले, “आज बिहार की जनता ने बिलकुल गर्दा उडा दिया…” आम्ही जनतेच्या मनावर राज्य करतो. जनतेचे मन आम्ही चोरले आहे. बिहारच्या जनतेने दाखवून दिले, फिर एक बार, एनडीए सरकार. बिहारच्या प्रचारादरम्यान आम्ही जेव्हा जंगलराज आणि कट्टाराजची टीका करत होतो. तेव्हा आमच्यावर राजद नव्हे, तर काँग्रेस पक्ष टीका करत होता. आता पुन्हा कधीही कट्टा सरकार येणार नाही.
बिहारमध्ये काही पक्षांनी ध्रुवीकरण करणारे माय (मुस्लीम, यादव) फॉर्म्युला बनवला होता. मात्र आजच्या निकालाने नवा माय फॉर्म्युला दिला आहे. याचा अर्थ आहे महिला आणि युवा. बिहारच्या जनतेने महाआघाडीच्या माय फॉर्म्युलाला उद्ध्वस्त केले आहे. मी बिहारच्या युवा, महिला, शेतकरी, कामगार, मच्छिमार सर्वांना नमन करतो, असेही ते म्हणाले.
हा फक्त एनडीएचा विजय नसून लोकशाहीचा विजय आहे. जामिनावर बाहेर असलेल्या लोकांना मतदार पाठिंबा देणार नाहीत, हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारत आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे. जिथे प्रत्येक कुटुंबाला सन्मान, समान संधी मिळत आहे. या भारतात ध्रुवीकरणाला कोणताही थारा नाही, असेही त्यांनी नमूद केले.