त्रिंबक भदगले : “मा. यशवंतराव गडाख पाटील हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे असामान्य नेतृत्व!”
नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी मा. खासदार यशवंतरावजी गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक आक्रमक आणि प्रभावी भूमिका मांडली. "शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि समृद्धीसाठी अखंड संघर्ष करणारे असामान्य नेतृत्व म्हणजे यशवंतराव गडाख पाटील," अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले.
बालवयातच काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणारा आणि त्यांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून झगडणारा नेता, समाजात नैतिकतेचा आदर्श निर्माण करणारा नेता म्हणून त्यांनी गडाख साहेबांच्या कार्याचा गौरव केला.
यशवंतराव गडाख यांनी सहकार, शिक्षण आणि साहित्य या त्रिसूत्रीचा सुंदर संगम साधत ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन घडवले. त्यांनी केवळ राजकारणात नव्हे, तर समाजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. संघर्षातून निर्माण झालेलं हे नेतृत्व समाजाच्या सर्व थरांत पोहोचले आहे.
नेवासा तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या वतीने त्रिंबक भदगले यांनी कोटी कोटी शुभेच्छा देत गडाख साहेबांच्या दीर्घायुष्याची व कार्यसमृद्धीची सदिच्छा व्यक्त केली.
चौकट
“शेतीच्या संघर्षातून नेतृत्व घडलेलं असतं – आणि ते यशवंतराव गडाखांसारखं असतं!” – असे शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले यांचे मत आहे