अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी मोटे यांचा उपोषणाचा इशारा
खरवंडी (वार्ताहर) - ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे नियमाप्रमाणे त्वरित निष्कासित न केल्यास येत्या ५ जून पासून वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा इशारा संदीप मोटे यांनी दिला आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनास दिलेल्या निवेदनात मोटे यांनी म्हटले आहे की, वडाळा बहीरोबा ग्रामपंचायत हद्दीतील एका कुटुंबाने नियमाप्रमाणे कुठल्याही शासकीय यंत्रणेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे निवासी तसेच व्यावसायिक बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे. या कुटुंबाने धारण केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक बांधकामे करून ग्रामपंचायतीच्या गटारे, रस्त्यांना अडथळा निर्माण केल्याचा आरोप मोटे यांनी निवेदनात केला आहे. या कुटुंबाने अतिक्रमणांद्वारे केलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे लगतच्या निवासी तसेच व्यावसायिक ग्रामस्थांना धोका निर्माण झाल्याकडे मोटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाचा अंकुश नसल्याने अशा प्रकारे गावात विनापरवानगी अतिक्रमित बांधकामांची संख्या वाढल्याचे मोटे यांनी निवेदनात नमूद करून या अतिक्रमणांमुळे गावातील रस्ते, गटारी आदी विकास कामांना अडथळा निर्माण झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे वडाळा बाहिरोबा ग्रामपंचायत प्रशासनाने येत्या आठ दिवसांत संबंधित कुटुंबाच्या अतिक्रमणांसह गावातील इतर सर्व अतिक्रमणे नियमानुसार तातडीने निष्कासित करण्याची कार्यवाही न केल्यास येत्या दि.५ जून २०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मोटे यांनी दिला आहे.